नाणीज येथे शाळकरी मुलींना बसमधून उतरवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची मागणी

रत्नागिरी दि. २२ जुलै :- रत्नागिरी तालुक्यातील नाणीज बस थांब्यावर 11 जुलै रोजी पास असलेल्या शाळकरी विद्यार्थिनींना बसमधून खाली उतरवून दमदाटी केल्याच्या प्रकरणाने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी MSRTC च्या विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात प्रसाद सावंत यांनी 3 ठोस मागण्या केल्या आहेत:
युवासेनेच्या प्रमुख मागण्या:
1. तात्काळ निलंबन : संबंधित पाली-घाटीवळे बसचे चालक आणि वाहक यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे.
2. गुन्हा दाखल करा: लहान मुलींवर दमदाटी करून त्यांना असुरक्षित सोडल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.
3. कर्मचाऱ्यांना समज: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व चालक-वाहकांना विद्यार्थ्यांशी, विशेषतः विद्यार्थिनींशी सौजन्याने वागण्याचे कडक आदेश देण्यात यावेत.
युवासेनेचा इशारा
निवेदनात पुढे म्हटले आहे की, या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व शिस्तभंगविषयक कारवाई झाली नाही, तर युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने रत्नागिरी आगारावर तीव्र आंदोलन करेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे एसटी प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.
11 जुलै रोजी दुपारी लांजा आगाराच्या ‘पाली-घाटीवळे’ बसने नाणीज येथे 4 शाळकरी मुलींना “आधी पैसे भरा” म्हणत पास नाकारून बसमधून खाली उतरवले होते. यामुळे त्या मुली बस थांब्यावरच रडत बसल्या होत्या.



