रत्नागिरी

पात्रता पडताळणी करुन पुढील कार्यवाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन आढावा बैठक

रत्नागिरी, दि. १८ :- कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी पात्रतेच्या निकषांची पडताळणी करुन पुढील कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जि.प.सदस्य प्रकाश रसाळ, कुवारबाव ग्रामपंचायत प्रशासक श्रीमती तळेकर आदी उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबतची योजना रहिवाशांना समजावून सांगणे आवश्यक आहे. गरीब लोकांना घरे देवून त्यांची जीवनशैली सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. याकरिता पात्रता पडताळणी करणे आवश्यक आहे. याबाबतच्या शासन निर्णयाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी उपस्थितांना केले. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी, खेळण्यासाठी जागा, अंगणवाडी, बालवाडी एकाच आवारात उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात उत्तम प्रकल्प होणार आहे, असेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button