आंबा, काजू, शेतकऱ्यांचा आज रत्नागिरीत एल्गार -माजी आमदार बाळ माने

रत्नागिरी दि. १८ : ग्लोबल वॉर्मिंग, बनावट खते आणि नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणात आंब्याचे पीक फक्त १५ टक्के आहे. कोकणात दीड लाख हेक्टरवर आंबा व तीन लाख हेक्टरवर काजू लागवड असून, सर्व बागायतदार, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. आंबा कलमाला पाच हजार रुपये व काजू झाडाला तीन हजार रुपये द्यावेत, असे रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आंबा, काजू बागायतदार गेली दहा वर्षे आक्रोश करत आहेत; परंतु त्यांच्याकडे राज्यशासन किंवा केंद्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी चळवळ उभी केली आहे. कोकणातील सर्व बागायतदार त्यांच्या पाठीशी आहेत, असे सांगून माने म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंग किंवा वातावरणातील प्रचंड बदलाचा फटका आंब्याला बसला आहे. ही नैसर्गिक आपत्ती असून, राज्यशासनाने याची दखल घेऊन केंद्र सरकारकडे मदत मागितल्यास निधी मिळेल.
संत्री बागायतदारांची समस्या असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देतात; परंतु आंबा बागायतदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे? राज्य सरकारने २२ हजार कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली असली तरीही अजून पंचनामे झालेले नाहीत. आंब्याच्या झाडाला २२० रुपये मिळतील. त्यातून काहीही होणार नाही. या वेळी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.
आज बैठक
सर्व गंभीर प्रश्नांवर चर्चा करून पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी आज शनिवारी (दि १८ एप्रिल) सकाळी १० वा. बालाजी मंगल कार्यालय शांतिनगर येथे शेतकरी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.



