अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील एनएसएस विभागातर्फे भाट्ये किनारा स्वच्छता

रत्नागिरी दि. ३ : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४० स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अभिजित भिडे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश जोशी, मनस्वी रांजेकर आणि सारिका माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी किनाऱ्यावर विखुरलेला प्लास्टिक कचरा व इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ केला. या वेळी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या स्वच्छता अभियानामुळे समुद्रकिनारा स्वच्छ होण्यास मदत झाली तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडून आले.



