पतंजली योग समिती, परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

रत्नागिरी दि. २१ : योग केल्यामुळे शरीर व मन सुदृढ, निरोगी बनते. योगाकडे लोक चाळिशीनंतर म्हणजे बऱ्याच उशिरा वळतात. योग ही जीवनशैली आहे. लहान मुलांचे शरीर लवचिक असते. मात्र माणूस मोठा होऊ लागल्यानंतर साचलेला मळ बाहेर काढण्याकरिता आसनांचा उपयोग होतो, असे पतंजली योगसूत्रांमध्ये सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी केले.
पतंलजी योग परिवार, अधिवक्ता परिषद, द. रत्नागिरी जिल्हा भाजप आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉलध्ये कार्यक्रम झाला. याप्रसंगी या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, न्यायाधीश आर. आर. पाटील, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. एम. एम. जैन, राज्य महिला पतंजली योग समितीच्या संरक्षक सदस्य रमाताई जोग, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विद्यानंद जोग आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात मांडलेल्या ठरावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला व २०१५ पासून हा दिन साजरा होत आहे. पतंजली परिवारातर्फे विनाखंड कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
नगराध्यक्ष शिल्पाताई यांनी सांगितले की, योग ही आपल्याला मिळालेली अमूल्य देणगी आहे, योगाचे महत्व सर्वांनाच माहित आहे. आपले शरीर निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी योग हे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले. नित्यनेमाने योग करा व निरोगी राहा.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून रा. भा. शिर्के प्रशाला, नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि विविध आसनांची प्रात्यक्षिके दाखवली. तसेच स्वरदा लोवलेकर व सहकाऱ्यांनी योगनृत्य सादर केले, किसान सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष भारत सावंत व सहकाऱ्यांनी गीत ऐकवले. तर योग शिक्षिका नीता साने व सहकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या योग, आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमात रत्नागिरीतील न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, वकील व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग शिक्षक अनंत आगशे यांनी सूत्रसंचालन केले. अधिवक्ता परिषदेच्या ॲड. सौ. प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले.
परमपूज्य योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास, आरोग्य जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश या वेळी दिला जाणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष मारुती अलकुटे युवा भारत जिल्हाध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला पतंजली योग समितीच्या जिल्हाध्यक्ष सौ. हर्षदा डोंगरे आदींसह सर्व योगशिक्षकांनी योगदान दिले.


