रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; सुमारे ९० लाखांचे ड्रग्ज नवी मुंबईत केले नष्ट!

रत्नागिरी दि. ४ :- अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला अधिक गती देत, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी (NDPS) कायद्यांतर्गत दाखल असलेल्या विविध ११ गुन्ह्यांमधील तब्बल ८९ लाख ७२ हजार ५ रुपये किमतीचा जप्त केलेला अंमली पदार्थांचा साठा नवी मुंबईतील तळोजा येथे यशस्वीरित्या नष्ट करण्यात आला.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.
या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेष ‘ड्रग्ज डिस्पोजल समिती’ (Drugs Disposal Committee) स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे हे असून, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती राधिका फडके या समितीचे सदस्य आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांना मिळालेल्या मार्गदर्शनानुसार, सन २०१९ ते २०२६ या कालावधीत एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दाखल झालेल्या ११ गुन्ह्यांमधील मुद्देमाल नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळवण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मंजुरीनंतर, आज (४ जुलै २०२६ रोजी) मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (M.W.M.L), तळोजा, नवी मुंबई या ठिकाणी वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धतीने (Incineration – जाळण्याच्या पद्धतीने) हा माल नष्ट करण्यात आला.
नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा तपशील:
गांजा: १० किलो ०४९ ग्रॅम ०५ मिलिग्रॅम
गांजाची रोपे: ४३ रोपे
चरस: ०९ किलो ०७८ ग्रॅम
कोकेन (युरिया): ९२६ ग्रॅम
एकूण वजन: २० किलो ०५३ ग्रॅम ०५ मिलिग्रॅम
एकूण किंमत: ₹ ८९,७२,००५/- (सुमारे ९० लाख रुपये)
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या थेट उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी चोखपणे पार पाडली.



