
देवरुख दि. १५ (सुरेश सप्रे) :- आगामी काळात आपापसातील मनभेद व मतमतांतरे बाजूला ठेवत पक्षाच्या ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शरीर व मन एकाग्र करून जनतेत आपली विश्वासार्हता निर्माण करत पक्षाची ताकद वाढण्यासाठी प्रयन करून जिल्हात पक्षाला गतवैभव मिळेल यासाठीच प्रयत्नशील रहा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) रत्नागिरी जिल्हा निरीक्षक व मुख्य प्रवक्ते महेश चव्हाण यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची जिल्हा आढावा बैठक देवरुख येथील एका मराठा भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक विजय देसाई, महेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, जेष्ठ महीला नेत्या नलिनीताई भुवड, महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षात अनेक सच्चे कार्यकर्ते आहेत. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शरीर पक्षात पण मन दुसरीकडे अशा द्विधा मनस्थिती न ठेवता शाहू. फुले. आंबेडकर यांचा वारसा पुढे नेण्यासाठी जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी संघटीतपणे संघर्ष करत राहीले तरच पक्षाला गतवैभव मिळेल असा विश्वास जिल्हा निरीक्षक विजय देसाई व्यक्त केला.
या आढावा बैठकीत अनेकांनी आपली परखड व पोटतिडकीने मते मांडत आपल्या भावना व्यक्त करताना वरीष्ठांनी कुठलाही निर्णय घेताना तो शहानिशा न करता लादु नये. यासाठी घटनेनुसार कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेत त्यांचेशी विचार विनिमय करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा अशा भावना अनेकांनी व्यक्त करत निरीक्षकांनी तसा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना सादर करावा. अशी अपेक्षा व्यक्त करून वरीष्ठांच्या कारभारावर ताशेरे ओढले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हा पक्ष कार्यकर्तेंचा आहे अस सांगितल जात. तिकीट वाटपात स्थानिकांशी चर्चा न करता परस्पर आघाडी करून कार्यकर्त्यांना वारेवर सोडून देता. यातूनच गैरसमज होत पक्ष वाढीला खिळ बसते असे स्पष्टपणे सांगितले.
यावर निरीक्षकांनी आपल्या प्रमाणीकपणे व्यक्त केलेल्या भावना पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून देण्यात येतील व सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. असा विश्वास दिला. या बैठकीला जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.



