नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी स्वीकारला पदभार; विकास कामांना देणार गती

रत्नागिरी दि. २९ : रत्नागिरी शहराचा सर्वांगीण विकास करताना नगर परिषदेची स्थिती अधिक भक्कम करण्याचा आपला प्रयत्न असेल. रत्नागिरी शहरातील प्रलंबित कामे पूर्णत्वास नेणे आणि नव्याने विकास कामांना चालना देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही रत्नागिरीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी आज पदग्रहण सोहळ्यात दिली.

तब्बल नऊ वर्ष रिकाम्या असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे सोमवारी २९ रोजी विराजमान झाल्या. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विशेष सोहळ्याला रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, तालुकाप्रमुख महेश म्हाप, महिला संघटक कांचन नागवेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब परुळेकर आणि भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.
या प्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते उपस्थित सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामुळे पालिकेच्या नवीन कार्यकाळाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.



