किरण लोहार यांची राज्यस्तरावर राज्य साक्षरता केंद्र सल्लागार समिती मध्ये निवड

संगमेश्वर दि. २८ ( प्रतिनिधी ) :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे राज्य साक्षरता केंद्र सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे.या समितीत,रत्नागिरी जिल्हा परिषद,प्राथमिक,माध्यमिक व योजना विभागाचे शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार यांची निवड झाली आहे.या समितीत एस सी आर टी चे संचालक राहुल रेखावर यांचे सह २५ सदस्यांचा समावेश आहे. ७ मार्च २०२४ रोजी योजना विभाग शिक्षणाधिकारी पदाची धुरा संभाळत असताना पुणे येथे राज्यस्तरीय उल्हास नवभारत साक्षरता मेळाव्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिक्षण मंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता.नंतरच्या काळात विभाग, जिल्हा,तालुका, केंद्र, शाळा या पातळीवरती उल्हास मेळावा अतिशय प्रभावी पणे राबवून मार्गदर्शन केले. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर वर्गांना भेटी देऊन वयोवृद्धांशी हितगुज साधून अनुभव जाणून घेतले. जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी स्वतः भेटीला आले याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला होता.
उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्याची उत्तुंग कामगिरी पाहता विशेष कार्याची दखल घेत जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची राज्यस्तरावर राज्य साक्षरता केंद्र सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम जिल्ह्याची एकंदरीत कामगिरी पाहता राज्यामध्ये अग्रगण्य असल्याकारणाने राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मेळावा दिल्ली येथे संपन्न झाला. त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची निवड करण्यात आली.
प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून जि.प. रत्नागिरी याचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी जिल्हा विविध उपक्रमामध्ये राज्यामध्ये प्रथम येण्यासाठी सूक्ष्म नियोजन किरण लोहार यांनी केले.कामाचा झपाटा,आणि विनाविलंब काम,शिक्षण क्षेत्रातील इथंबुत माहिती,शासन निर्णयांचा सूक्ष्म अभ्यास,कुशाग्र बुद्धिमत्ता व शाळा व्यवस्थापनाची अचूक माहिती यामुळे किरण लोहार यांचे कडे आदराने पाहिले जाते. किरण लोहार यांची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील शिक्षण संस्था,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विविध संघटना यांचे तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.



