बस नाही, रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाही पण अतिथी आणि मंत्र्यांसाठी नव्या गाड्या
ही तर लोकशाहीची हत्या, रत्नागिरी ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा आरोप

रत्नागिरी दि. १४ ऑगस्ट : या लोकशाहीतील मंत्री महोदय शासकीय दौऱ्यासाठी महागड्या चारचाकी गाड्यांमधून येत असतात. रत्नागिरी मधील परिस्थीतीही यापेक्षा वेगळी नाही. आता तर मंत्री महोदय आणि राज्य अतिथी यांच्या दिमतीसाठी वेगळाच घाट घातला जातोय. वाहनांची आवश्यकता नसताना आता रत्नागिरीतील मंत्र्यांसाठी आलिशान गाड्या मागवल्या आहेत त्या कशासाठी मागवल्यात? दुसरीकडे सर्वसामान्य जनता मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित असताना हा निधी जनतेसाठी न वापरता फक्त दिखाव्यासाठी खर्च होतोय का? असा प्रश्न ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी उपस्थीत केलाय.
“सरकारी पैशांची उधळपट्टी सुरू आहे. एकीकडे मंत्र्यांसाठी महागड्या गाड्या, तर दुसरीकडे लोकांना चांगले आरोग्य उपचार नाहीत. युवकांना रोजगार नाही. शाळेतील मुलांसाठी बस नाही. चांगले रस्ते नाहीत, साकव नाहीत.”, असे असताना तुमच्या मनाला काहीच कसे वाटत नाही?? तुमची हीच का जनसेवा? असा प्रश्नही सावंत यांनी केलाय.
विद्यार्थी खड्ड्यातून शाळेत जात आहेत. 6 वर्षांपासून बससेवा बंद आहे. पण प्रशासनाला मात्र मंत्र्यांच्या सोयीसाठी निधीची कमतरता भासत नाही का असा सवालही त्यांनी उपस्थीत केलाय.
प्रसाद सावंत पुढे म्हणले की, “मी शिकलोय लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण इथे तर उलट चित्र आहे. सर्व मंत्री सधन असताना सरकारी पैशांवर डल्ला का मारायचा? तोच पैसा लोकहितासाठी वापरा. लोकांच्या पैशातून जर मंत्री छानशौकी करत असतील, तर ती लोकशाहीची हत्या आहे. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काटकसरीचे आवाहन करत असताना त्यांच्याच प्रशासनाकडून पैशाची उधळपट्टी सुरु आहे हे खेदजनक असल्याचेही ते म्हणाले.
जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च व्हावा, हीच सर्वसामान्यांची मागणी आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा गावातील रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य मिळणार का? हा सवाल आता प्रशासनासमोर उभा आहे.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ह्या गाड्या घेतल्या जात आहेत. 2 की 3 इन्नोवा क्रिस्टा आणि एक फॉर्चूनर रत्नागिरीत दाखल झाल्याचा दावा सावंत यांनी केलाय.


