‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय महिला प्रशिक्षकांचे प्रशिक्षण; ५००० महिलांचा सहभाग

पनवेल दि. २१ :- राज्यातील मुलींना स्वसंरक्षणाचे सक्षम प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान’ अंतर्गत राज्यस्तरीय महिला प्रशिक्षकांची कार्यशाळा नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणा येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल येथे उत्साहात पार पडली.
दिनांक १७ व १८ फेब्रुवारी रोजी आयोजित या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५००० महिला प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवला. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील १२४ मुलींनीही प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना आत्मसंरक्षणाचे विविध तंत्र शिकविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. प्रशिक्षकांना अधिक अद्ययावत, प्रभावी आणि परिपूर्ण प्रशिक्षण देता यावे, या उद्देशाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे आयोजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक शिंफु भात यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सराव व मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली. प्रशिक्षकांना विविध आत्मरक्षा तंत्रांचे प्रात्यक्षिकांसह सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणानंतर राज्यभरातील शाळांमध्ये मुलींना अधिक सक्षमपणे आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला प्रशिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महिला सबलीकरण, आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास वृद्धीसाठी शासनाचा हा उपक्रम महत्त्वाकांक्षी व दूरगामी ठरणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. राज्यातील मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवून सुरक्षित व सक्षम समाज निर्मितीसाठी हे अभियान निर्णायक पाऊल ठरणार आहे.



