जिल्ह्यात धोकादायक विद्युत खांब व वाढीव बिलांविरोधात बहुजन समाज पार्टी आक्रमक!
महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन

गणपतीपुळे दि. १३ ऑगस्ट (वैभव पवार) :- रत्नागिरी जिल्ह्यातील गंजलेले व धोकादायक विद्युत खांब तातडीने बदलण्यात यावेत आणि वीज पुरवठा खंडित असतानाही येणाऱ्या तफावतयुक्त वीज बिलांची चौकशी व्हावी, या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या (BSP) वतीने महावितरणचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भागांतील गंजलेल्या व पडझड होण्याच्या स्थितीत असलेल्या विद्युत खांबांचा महावितरणने स्वतःच्या यंत्रणेमार्फत तातडीने सर्व्हे आणि स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अपघात किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी धोकादायक खांब तात्काळ बदलण्यात यावेत, वीज पुरवठा बंद असतानाही ग्राहकांना भरमसाठ व तफावत असणारी बिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या सदोष बिलिंग पद्धतीची सखोल चौकशी करून ग्राहकांना दिलासा देण्यात यावा.
बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत अधिक्षक अभियंत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील तिन्ही कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भात तात्काळ सुचित करून सर्व्हे व आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
महावितरण च्या अधीक्षक अभियंतांना निवेदन सादर करताना बहुजन समाज पार्टीचे रत्नागिरी विधानसभा प्रभारी किशोर पवार, रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा उपाध्यक्ष अनंत पवार, ॲड. प्रवीण कांबळे, तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी अनिकेत पवार हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

