सकल हिंदू समाजातर्फे रत्नागिरीत उद्या अखंड भारत संकल्प दिन
हिंदुत्ववादी नेते नितेश राणे करणार मार्गदर्शन

रत्नागिरी दि. १३ ऑगस्ट :- सकल हिंदू समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अखंड भारत संकल्प दिन उद्या दि. १४ ऑगस्ट रोजी अखंड भारताचा संकल्प करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यलक्ष्मी चौक ते मारुती मंदिरपर्यंत मोटरसायकल रॅली व त्यानंतर स्वा. सावरकर नाट्यगृहात हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत व्याख्यानाचे आयोजन केले.
सायंकाळी ४.३० वाजता लक्ष्मी चौक, गाडीतळ, रत्नागिरी येथून मोटारसायकल रॅली निघेल. मारुती आळी, जयस्तंभ, मारुती मंदिर, सावरकर नाट्यगृह येथे या रॅलीची सांगता होईल. त्यानंतर ५:४५ वाजता प्रखर हिंदुत्ववादी नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारत मातेच्या सुपुत्रांना मार्गदर्शन लाभेल. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आपणास करण्यात येत आहे.
प्रत्येक राष्ट्रभक्ताच्या मनामध्ये फाळणीच्या वेदना व अखंड भारताचे स्वप्न हे असलेच पाहिजे. अखंड भारतातील अफगाणिस्तान इथे श्रीरामांची आई कैकयी यांची भूमी समजली जाते. तिबेट हे भगवान शिवाचे स्थान, नेपाळ येथे सीता मातेचा जन्म झाला, तसेच ते पशुपतिनाथचे स्थान आहे. भूतान हे शांतीधर्म आणि बौद्ध संस्कृतीची भूमी आहे. बांगलादेश भारतीय कला व दुर्गा मातेची भूमी तर म्यानमार येथून बौद्ध धर्माचा विस्तार झाला. श्रीलंका रामायणाची अमरभूमी आहे. पाकिस्तान येथून सिंधू सभ्यता उदयास आली. २७० वर्षांमध्ये भारताचे तेरा तुकडे झाले, भारताचे आताचे क्षेत्रफळ हे एक तृतीयांश एवढे आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी अरविंद, प. पू. गोळवलकर गुरुजी इत्यादी राष्ट्रपुरुषांनी, ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिले, त्यांनी भारत कधी खंडित होईल, असा विचार तरी केला होता का?, भारत एक प्राचीन राष्ट्र आहे, एक राष्ट्र, एक संस्कृती हा विचार मागे पडून नवराष्ट्र निर्मितीचा विचार पुढे कसा आला? भारताच्या मानबिंदूंसोबत तडजोड कशी झाली? तुष्टीकरण नव्हे तर विकृतीकरण कसे झाले? अखंड भारताची आवश्यकता काय? याबाबत ते या कार्यक्रमात सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत मातेच्या सुपुत्रांमध्ये ‘भारत एक प्राचीन राष्ट्र आहे’, ‘एक राष्ट्र, एक संस्कृती’ हा विचार मनामध्ये बिंबवला जाणार आहे. याकरिता १४ ऑगस्ट रोजी बहुसंख्येने सहभागी होऊन अखंड भारताचा संकल्प करूया. अखंड भारत हे एक स्वप्न नसून ध्येय आहे, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.



