रत्नागिरी

रत्नागिरी शहरात प्लास्टिक बंदी; प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापारी वर्गाची बैठक संपन्न

रत्नागिरी दि. १२ ऑगस्ट : रत्नागिरी नगरपरिषदेच्या वतीने आज नगरपरिषद सभागृह येथे शहरातील व्यापारी वर्गासाठी एकल वापर प्लास्टिक बंदी व घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ संदर्भात मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली.

बैठकीमध्ये एकल वापर प्लास्टिक बंदी या विषयाचे सविस्तर सादरीकरण व मार्गदर्शन माहिती, शिक्षण व संवाद (IEC) तज्ञ श्री. शिवराज जाधव यांनी केले. यावेळी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांच्या नियमावलीनुसार प्रतिबंधित प्लास्टिकचे साठवणूक, विक्री व वितरण पूर्णपणे बंद करण्याबाबत व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शहरातील बाजारपेठेतून प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक हटवून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील नागरिक व व्यापारी वर्गाची जबाबदारी याबाबतही चर्चा करण्यात आली.

प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून प्रथम उल्लंघन ₹५,०००, द्वितीय उल्लंघन ₹१०,००० व तृतीय उल्लंघन ₹२५,००० दंडाची तरतूद असल्याची माहिती देण्यात आली. तसेच लागू कायदे व नियमांनुसार पुढील कडक कारवाईच्या तरतुदींबाबतही उपस्थितांना अवगत करण्यात आले.

यावेळी वापरण्यास परवानगी असलेले प्लास्टिक व निर्बंध असलेले प्लास्टिक याबाबत व्यापाऱ्यांना स्पष्ट माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून प्लास्टिकमुक्त व स्वच्छ रत्नागिरी घडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनासोबत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस रत्नागिरी नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष श्री. समीर तिवरेकर, आरोग्य सभापती श्री. राकेश नागवेकर,सर्व समितीचे सभापती व  नगरसेवक तथा नगरसेविका, आणि मुख्याधिकारी श्री. वैभव गारवे, उपमुख्याधिकारी श्री मयूर बेहेरे, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button