
रत्नागिरी, दि. २९ :- कृषी विभागांतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांच्यामार्फत शेतक-यांच्या प्रगतीसाठी महत्वाकांक्षी कृषी समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शेतक-यांना सिंचन सुविधा, फलोत्पादान तसेच यांत्रिकीकरणां संबंधी अनुदान मिळणारा आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार निवड होणार असून त्याकरिता htts://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin वेबसाईट वरून महाडीबीटी पोर्टलवर सीएसी द्वारे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याकरीता ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व गावातील सहाय्यक कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा.
सिंचन सुविधा बाबींमधून शेतक-यांना इलेक्ट्रीक मोटर पंप, डिझेल/पेट्रोल इंजिन, पाईप संच पुरवठा, ठिबक सिंचन व तुषार सिंचन करिता अनुदान देण्यात येणार आहे. सिंचन संलग्न योजनेमधून ठिबक व तुषार सिंचनाकरीता 20 गुंठे ते 5 हेक्टर पर्यंत लाभ घेता येईल. याअंतर्गत लहान व सिमांत शेतकरी, इतर शेतकरी व अनुसुचित जाती व जमातीमधील शेतकरी यांच्यासाठी मिळणाऱ्या अनुदानाची मर्यादा वेगवेगळी आहे.
फलोत्पादन या बाबीमधून शेतक-यांना हरितगृह, शेडनेट, मल्चींग पेपर, वीडमॅट, पॅक हाऊस, फळ प्रक्रिया केंद्र, आंबा पुनरुज्जीवन, रोपवाटिका उभारणी व औषधी, मसाला, फुलशेती क्षेत्रविस्तार या करिता अनुदान मिळणारा आहे.
फलोत्पादनाशी संलग्न असणाऱ्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत 10 गुंठे ते 10 हेक्टर पर्यंत लाभ घेता येईल.
यांत्रिकीकरण या बाबींमधून शेतक-यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप, भात कापणी यंत्र, कडवा कुठ्ठी, श्रेडर, वुड चीपर, सुपारी काढणी यंत्र इत्यादी यंत्र अवजारांवर 40 टक्के व 50 टक्के अनुदान मिळणारा आहे.



