रत्नागिरी

शिक्षक समितीचे २४ ऑगस्टला रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

खेड दि. २० ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

१५ मार्च २०२४ रोजीच्या संच मान्यता शासन निर्णयाच्या अनुषंगाने पदवीधर शिक्षकांचे उपशिक्षक पदावर झालेले समायोजन, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गणित-विज्ञान विषयातील पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रसिद्ध झालेली जाहिरात तसेच पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी यांसह विविध प्रश्नांवर शिक्षक समितीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, या प्रश्नांवर वर्षभराचा कालावधी उलटूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शिक्षक समितीने केला आहे.

शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या आणि प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे जिल्हाव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातूनही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, तालुका नेते बबन साळवी, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, प्रसिद्धीप्रमुख राजेश भागणे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण खांडेकर, नरेश ठोंबरे, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, संतोष बर्वे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

दरम्यान, खेड तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोरील धरणे आंदोलनात उपस्थित राहावे, असे आवाहन संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर आणि दिलीप यादव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button