
गणपतीपुळे दि. २० ऑगस्ट (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थी कुमार अथर्व अनंत आग्रे याची राज्यस्तरीय टेनिस अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. उद्या दिनांक 20 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो रत्नागिरीतून रवाना होणार आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती.
त्यानंतर जुलै महिन्यात रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल मध्ये झालेल्या निवड चाचणी मधील आपल्या उत्कृष्ट कामगिरी खेळातील कौशल्य शिस्त आणि निवड समितीच्या निरीक्षणाच्या आधारे जिल्हा संघटनेच्या निवड समितीने आगामी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवी सतरा वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची जिल्हा रत्नागिरी संघामध्ये निवड केली आहे.
या स्पर्धा 20 ऑगस्ट 2026 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत राहुरी जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर महाराष्ट्र येथे होणार आहेत .या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व अथर्व अनंत आग्रे हा आहे .अथर्व हा अतिशय गुणवान आणि होतकरू असा क्रिकेट खेळाडू आहे. त्याला बालपणापासूनच कबड्डी खेळाबरोबरच त्याला क्रिकेटची विशेष आवड निर्माण झाली.
मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयात शालेय शिक्षण घेत असतानाच त्याने शालेय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.तसेच गावातील विविध क्रिकेट संघातून तो सातत्याने आपल्या खेळाची छाप उमटवली आहे. त्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तो उजव्या हाताने बॉलिंग करतो तर उजव्या हाताने बॅटिंग करतो. एकूणच गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात तो अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो.
त्याचे वडील अनंत श्रीपत आग्रे हे माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले असून त्यांनी आपल्या मुलाला प्रोत्साहन दिल्यामुळे त्याची खेळात विशेष उल्लेखनीय घौडदौड सुरू आहे . पालक व शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धे पर्यंत आपली निवड सार्थ ठरवली आहे.
शालेय जीवनात क्रिकेट खेळाला त्याला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बिपिन परकर सर , क्रीडाशिक्षक आणि अन्य शालेय शिक्षक यांनी विशेष मार्गदर्शन केले आहे. तसेच आई-वडिलांचा भरघोस पाठिंबा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे अथर्व याने टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्हा संघात आपले स्थान मिळवून आपल्या आई-वडिलांचे आणि गावाचे नाव मोठे केले आहे.
त्याच्या आईवडिलांसाठी आणि संपूर्ण मालगुंड गावासाठी त्याची कामगिरी अभिमानास्पद ठरली आहे .या निवडीबद्दल त्याचे संपूर्ण मालगुंड गावातून आणि बळीराम परकर विद्यालय येथील शिक्षण संस्था व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांमधून विशेष अभिनंदन होत असून त्याच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आले आहेत.



