जी.जी.पी.एस. प्रशालेमध्ये तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा यशस्वी

रत्नागिरी दि. ४ सप्टेंबर :- जी. जी. पी. एस.प्रशालेमध्ये रत्नागिरी तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी मेळावा आज आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी रत्नागिरी तालुक्यातून १३ शाळांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नागिरी पंचायत समिती विषयतज्ज्ञ सौ. अश्विनी काणे यांनी केले. प्रास्ताविक तालुका विज्ञान मंडळ रत्नागिरीचे सचिव इम्तियाज सिद्दिकी यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. तालुका विज्ञान मंडळ रत्नागिरीचे अध्यक्ष विजयानंद निवंडेकर यांनी स्पर्धेची रूपरेषा विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. सुरुवातीला विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती विशद करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भारतीय ऊर्जाक्षेत्र २०४७ चे भवितव्य- संधी आणि आव्हाने या विषयावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. या स्पर्धेसाठी परीक्षणाचे काम रुपेश यादव, प्रकाश परांजपे, सौ. सायली केतकर यांनी पाहिले. स्पर्धेत प्रथम क्रमांक शाल्वी प्रदीप शिवगण (जी. जी. पी. एस.), द्वितीय क्रमांक मुक्ता मोहन बापट (फाटक हायस्कूल), तृतीय क्रमांक आईशा ताहीर मुल्ला (सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट सिटी हायस्कूल) यांनी पटकावले. यातून जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन जी.जी. पी. एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर यांनी केले. सूत्रसंचालन महेश मुळ्ये यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



