रत्नागिरी जिल्ह्यात ३६० नागरी संरक्षण स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्रांचे वितरण
आपत्ती व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

जैतापूर दि. १७ जुलै :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत नागरी संरक्षण, रत्नागिरी कार्यालयाच्या वतीने जून २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर आदी तालुक्यांमध्ये “नागरी संरक्षण क्षमता बांधणी व विकास (Civil Defence Capacity Building)” या प्रशिक्षण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये विविध क्षेत्रांतील तब्बल 360 स्वयंसेवकांनी सहभाग घेत आपत्ती व्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण पूर्ण केले.
या प्रशिक्षणाचा समारोप आणि प्रशिक्षणार्थींच्या कार्याचा गौरव म्हणून 16 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात प्रशस्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard), रत्नागिरीचे कमांडंट श्री. शैलेश गुप्ता तसेच 2 नेव्हल एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर श्री. रामानुजन दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी बदलत्या जागतिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, पूर, भूकंप, चक्रीवादळ, आग, दुर्घटना आणि इतर आणीबाणीच्या प्रसंगी प्रशिक्षित नागरी संरक्षण स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. शासनाची यंत्रणा नागरिकांच्या मदतीला धावून येत असली, तरी स्थानिक पातळीवरील प्रशिक्षित स्वयंसेवकांची तत्परता अनेक जीव वाचविण्यास मोलाची ठरते, असे त्यांनी नमूद केले.
लेफ्टनंट कर्नल प्रशांत आर. चतुर (नि.), उपनियंत्रक, नागरी संरक्षण, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणामध्ये प्रथमोपचार, अग्निशमन, शोध व बचाव (Search & Rescue), विमोचन कार्य, आपत्ती व्यवस्थापन, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, आपत्कालीन प्रतिसाद, समन्वय तसेच स्वयंसेवकांची जबाबदारी या विषयांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.
कोकण किनारपट्टीवर दरवर्षी मुसळधार पाऊस, पूर, दरड कोसळणे, चक्रीवादळे तसेच इतर नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत स्थानिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे ही काळाची गरज असून, या उपक्रमामुळे प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षित स्वयंसेवकांचे सक्षम जाळे निर्माण होत आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला तातडीने मदत करण्यासाठी हे स्वयंसेवक महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व 360 स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच समाजातील अधिकाधिक युवक-युवतींनी नागरी संरक्षण दलात सहभागी होऊन प्रशिक्षण घ्यावे, स्वतः सज्ज व्हावे आणि इतरांनाही या कार्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन प्रमुख पाहुणे आणि अधिकाऱ्यांनी केले.
हा संपूर्ण प्रशिक्षण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी मास्टर ट्रेनर्स, प्रशिक्षक, नागरी संरक्षण विभागातील सर्व अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांनी नियोजन, समन्वय आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि कार्यतत्परतेमुळेच जिल्ह्यातील 360 स्वयंसेवकांना दर्जेदार प्रशिक्षण देणे शक्य झाले. या सर्वांच्या कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्यास मोठी मदत झाली असून, भविष्यात अशा प्रशिक्षण वर्गांचे आयोजन अधिक व्यापक स्तरावर करण्याचा मानस नागरी संरक्षण, रत्नागिरी कार्यालयाने व्यक्त केला.



