क्रीडारत्नागिरी

राज्य निवड स्पर्धेत मुंबईचा निर्वाण शाह, रत्नागिरीचा सौरीश कशेळकर आणि नागपूरचा शुभम लाकुडकर विजेतेपदाचे प्रबळ दावेदार

स्पर्धेची आठवी फेरी शिल्लक – रत्नागिरीच्या सौरीशला राज्य निवड स्पर्धेच्या विजेतेपदाची संधी

रत्नागिरी दि. १८ : येथील मराठा भवन येथे आयोजित एच 2 ई पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या सात फेऱ्या पार पडल्या असून अंतिम फेरीत विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. अंतिम फेरीत पहिल्या बोर्डवर सहा गुणांसह रत्नागिरीचा सौरीश कशेळकर साडे सहा गुण असलेल्या मुंबईच्या निर्वाण शहा याच्यासोबत तर नागपूरचा शुभम लाकुडकर साडेपाच गुण असलेल्या अग्रमानांकित इंद्रजीत महिंद्रकर सोबत विजेतेपदासाठी लढत असून अतिशय रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे.

भारताचे पहिले राष्ट्रीय विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेत रत्नागिरीच्या बुद्धिबळ खेळाडूंनी दाखवलेली चमक मुळच्या देवरूखच्या असलेल्या रामभाऊंना खरी आदरांजली ठरत आहे. जिल्ह्यातील जवळपास बऱ्याच जणांना फिडे मानांकन मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

या स्पर्धेच्या पहिल्या वहिल्या आवृत्तीत रत्नागिरीचा अवधूत पटवर्धन विजेता ठरला होता. त्यानंतर झालेल्या स्पर्धांमध्ये कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्तर सम्मेद शेटे तीन वेळा, पुण्याचा राहुल वर्मा तसेच फिडे ऑलीम्पियाड सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा प्रशिक्षक चेन्नईचा ग्रॅंडमास्टर श्रीनाथ नारायणन तसेच आंतरराष्ट्रीय मास्टर नुबेरशाह शेख, ऑनलाइन स्पर्धेचा विजेता उझबेकिस्तानचा अब्दुसालीमोव्ह अब्दुमालिक विजेते ठरले होते तर गतवर्षीच्या स्पर्धेत गोव्याचा मंदार लाड व रत्नागिरीचा यश गोगटे विजेते झाले होते. यंदाच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावून ह्या दिग्गजांच्या पंगतीत कोण आपले नाव कोरतो का याकडे रत्नगिरीकरांचे लक्ष लागले आहे.

या स्पर्धेअंती पुढील महिन्यात होसूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा होणार असून ३ रेटिंग ग्रुपमध्ये एकूण १२ खेळाडूंचा महाराष्ट्र संघ जाहीर केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button