
रत्नागिरी दि. १६ :- रत्नागिरी येथे शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. त्यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सर्वांच्यावतीने मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरीत मनःपूर्वक स्वागत केले आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या मेळाव्यात बोलताना ना. उदय सामंत यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री ना. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत विकासाची नवी क्रांती घडत आहे. मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी रत्नागिरी मेडिकल कॉलेजसाठी तब्बल ₹५०० कोटी, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी ₹१८०० कोटींचा निधी दिला — ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक कामगिरी आहे.
तसेच गुहागर–जयगड पूल (₹१२०० कोटी) आणि काळबादेवी – मिऱ्या पूल (₹७५० कोटी) अशा मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देऊन रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणाच्या पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे.
साहेबांचा हा रत्नागिरीतील आठवा दौरा असून, त्यांच्या या सातत्यपूर्ण भेटी विकासाची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याची साक्ष देतात.
आजच्या मेळाव्यात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ना. उदयजी सामंत यांनी आवाहन केले की, “आपण सर्वांनी शिंदे साहेबांना शपथपूर्वक शब्द द्यायचा आहे. त्यांनी ज्या उमेदवाराला तिकीट दिले, तो आपला कुटुंबातील सदस्य समजून मोठ्या मताधिक्यानं निवडून आणायचा!” शिवसेना म्हणजे कुटुंब, आणि या कुटुंबाचा प्रमुख म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एकजुटीनं भगवा फडकवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
या प्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, माजी मंत्री दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक, आमदार किरणभैय्या सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार राजन साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजू अण्णा महाडिक, माजी आमदार संजय कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचनाताई महाडिक, माजी आमदार राजन तेली, संजय आंग्रे, दत्ताजी सामंत, राहुल पंडीत आदी मान्यवर, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



