रत्नागिरी विमानतळ उभारणीचे काम ५० टक्केपेक्षा जास्त पूर्ण; मे महिन्यात विमानसेवा सुरू होणार!
अलायन्स एअर या कंपनीला रत्नागिरी- मुंबई - रत्नागिरी अशी विमानसेवा सुरु करण्याची परवानगी

रत्नागिरी दि. ४ :- येथील विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम ५० टक्केपेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे. कोणत्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये ३१ मार्चला टर्मिनल बिल्डिंग काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अलायन्स एअर या कंपनीला रत्नागिरी – मुंबई – रत्नागिरी अशी विमानसेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवरील या महत्त्वपूर्ण विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे हस्ते व्हावे असा आपला प्रयत्न राहणार असून, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना आपण विनंती करणार असल्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री श्री. डॉ. उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मे महिन्यात रत्नागिरीतून विमानसेवा सुरू होईल, असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला.
ना. सामंत यांनी आज रत्नागरी विमानतळाच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार श्री. किरण सामंत यांचेसह अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. सामंत म्हणाले की, रत्नागिरी विमानतळ जे आपण रत्नागिरीच्या लोकांसाठी सुरू करणार होतो त्याचं टर्मिनल बिल्डिंगचं काम ५० टक्केपेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ३१ मार्चला टर्मिनल बिल्डिंग काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अलायन्स एअर कंपनीला मुंबईपासून रत्नागिरी पर्यंत रत्नागिरी पासून मुंबई पर्यंत विमानाचा परमिशन देण्यात आलेली आहे. आज आपण या विमानतळाची पाहणी केली, जे गेले कित्येक दिवस रत्नागिरीकरांचा स्वप्न होतं की रत्नागिरीच्या विमानतळावरनं टेकऑफ झालं पाहिजे. इथल्या शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांच्या मुली शिक्षणासाठी जर मुंबईला जाणार असतील किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबईला जाणार असतील तर त्यांना कमी दरामध्ये विमानाचा प्रवास झाला पाहिजे. ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात आणण्यात सुरुवात केली होती, त्यालाच मुर्त स्वरूप प्राप्त झालेले आहे.
या विमानतळात लाकडाचे फर्निचर असणार आहे, कारण लाकडाचा प्रभाव आपल्या जिल्ह्यावर फार मोठ्या प्रमाणात आहे. लाकडाचे फर्निचर आपण घरामध्ये देखील करतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की पूर्वीपर्यंत बांबू हा फॉरेस्ट मध्ये होता आणि नंतर बांबू हे गवत आहे हे मा. नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केल्यामुळे आता बांबूचा वापर करणे म्हणजे ऑक्सिजनची वाढ करणे ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रातला पहिला असा विमानतळ असेल की या ठिकाणी बांबूचा वापर केला जाईल आणि एक नवा आदर्श या विमानतळातून बाकीच्या विमानतळाला घालून दिला जाईल.
याशिवाय महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला मी सूचना केलेली आहे की इथं जे काही खाद्यपदार्थ येणाऱ्या पर्यटकांना, उद्योजकांना द्यायचे आहेत ते येथील बचत गटाच्या माध्यमातून देण्यात यावेत. जर आपण हे काम केले तर आपल्या वेगळा ठसा जगाच्या पातळीवर या विमानतळाचा माध्यमातून उमटू शकतो, असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला.



