
रत्नागिरी दि. ५ ऑगस्ट :- १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यात अत्यंत महत्त्वाचे असणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, संसदीय लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते एस एम जोशी यांचे मुळ गाव गोळप ( रत्नागिरी) . त्यांच्या मुळगावी त्यांचे भव्य स्मारक एस एम अण्णांच्या लढवय्या जाज्वल्य इतिहासाच्या प्रेरणा युवा पिढीसमोर आदर्श स्वरुपात साकारावी अशी मागील अनेक वर्षाची इच्छा प्रत्यक्ष वास्तवात येण्याच्या शक्यतेला चालना मिळत आहे.
राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, ना. उदयजी सामंत यांनी गोळप येथे एस एम आण्णा यांचे मुळ राहत्या घराचे ठिकाणी त्यांचे स्मारक अत्यंत आकर्षक पध्दतीने शासनातर्फे उभारण्याचा मनोदय व्यक्त केला.
एस एम जोशी हे राष्ट्रसेवादलाच्या स्थापनेचे शिल्पकार, पुरोगामी, समाजवादी चळवळीचे सेनानी , आदर्श आणि चारित्र्यसंपन्न राजकिय नेतृत्व तरुणाईचा आदर्श , नवनिर्माण आंदोलनातील जयप्रकाश नारायण यांचे प्रमुख सहकारी, गोळप या त्यांच्या मुळ गावी त्यांचे तरुणाईचे प्रेरणा स्थळ असे स्मारक उभे रहाणे हा लाखो एसएम प्रेमी जनतेला, पुरोगामी , विवेकशील, प्रगतिशील विचारांच्या चळवळीसाठी अत्यंत आनंदाची घटना आहे. राष्ट्र सेवादलाचे माजी विश्वस्त , आणि एस एम यांचे सहकारी भाई वैद्य यांची प्रचंड इच्छा होती , अनेक वर्षांपूर्वी यासाठी प्रयत्न केला. ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हा संकल्प लवकरच पुर्ण होईल.
कोकणचा वैचारिक सांस्कृतिक साहित्यिक वारसा जपणे आणि अधिकाधिक गतिमान करत पुढील पिढीसमोर त्या मानदंडांचा इतिहास नोंदवत आदर्श देणे यासाठी आवश्यक वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता असणारे ना. उदय सामंतांचे नेतृत्व हा या जिल्ह्याचा अभिमान आहे.
माझे श्रध्दास्थान , वैचारिक आदर्श साथी एस एम जोशी यांच्या स्मारक समितीत मला काम करण्याची संधी ना. उदय सामंत यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आज मी, श्री. नेताजी पाटील ( प. स सदस्य), वारिशे, डॅा. सदानंद आगरे आम्ही गोळप येथील एस एम जोशी यांचे मुळ घर पहायला गेलो. आज येथे कोणीच रहात नाही, मुळ घर बहुतांश कोसळले आहे.
येथे ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नातून उत्तम असे एसएम जोशी यांचे स्मारक पुढील काही काळात उभे राहील जे तमाम महाराष्ट्रातील आणि देशांतील युवकांच्या वैचारिक चळवळींचे , मुल्याधिष्ठतेचे , संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहास कथन करणारे आणि येथील पर्यटकांना कोकणच्या लाल मातीचा इतिहास उलगडून सांगणारे असेल.



