रत्नागिरी

भाजपाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराने निधन

रत्नागिरी दि. ५ ऑगस्ट :- भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येत असताना पाली येथे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या घटनेमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून कार्यकर्त्यांवर शोकाकुल छाया पसरली आहे.

राजेश सावंत यांनी रत्नागिरीत भाजपची संघटनात्मक मुळे रुजवण्यात आणि पक्ष वाढवण्यात मोलाचे योगदान दिले. दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागापर्यंत पक्ष पोहोचवला. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, कार्यकर्त्यांशी असणारा थेट संवाद आणि उत्तम संघटन कौशल्य यांमुळे त्यांनी पक्षात व जनतेत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

उद्या मूळ गावी अंत्यसंस्कार

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजेश सावंत यांच्या पश्चात त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि कार्यकर्ते असा परिवार आहे. उद्या त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button