देवरुख पंचायत समितीचा गलथान कारभाराविरोधात जाकीर शेकासन यांचा आंदोलनचा इशारा
वर्षभरापासून जन्म दाखला नाही, ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष

देवरुख दि. २७ ऑगस्ट :- संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असलेल्या देवरुख पंचायत समितीचा गलथान कारभाराने सामान्य जनतेला अत्यावश्यक गरज असलेला जन्माचा दाखला मिळण्यासाठी नागरिकांना वर्षभरापासून हेलपाटे मारावे लागत असून, निवेदन देऊनही त्याचा निपटारा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य जाकिर शेकासन यांनी नाराजी व्यक्त करीत आंदोलनचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायतीत अधिकारी दीर्घकाळ कार्यालयात गैरहजर राहत असल्याने संपूर्ण यंत्रणा कोलमडली असून याचा आर्थिक आणि मानसिक फटका सामान्य जनतेला बसत असल्याचे त्यांनी सांगितले
प्राप्त माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामसेवक हे आठवड्यातून एकदाही कार्यालयात येत नाहीत. कार्यालयाला बहुतांश वेळा कुलूप असते. त्यामुळे जन्म दाखला, मृत्यू दाखला, रहिवासी दाखला, घरपट्टी पावती अशा दैनंदिन कामांसाठी नागरिकांना वारंवार पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. एका जन्म दाखल्यासाठी अर्ज करून एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप दाखला मिळालेला नाही, अशी अनेक प्रकरणे आहेत. शाळा प्रवेश, शासकीय योजनांचा लाभ, आधार कार्ड, अशा महत्त्वाच्या कामांसाठी जन्म दाखला अनिवार्य असताना प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि पालकांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेकासन यांनी सांगितले.
केवळ दाखलेच नाही तर नागरिकांनी दिलेल्या निवेदनांचा देखील कोणताही निपटारा केला जात नाही. ग्रामस्थ तक्रार घेऊन गेल्यास त्यांना उद्या या, परवा या असे सांगून परत पाठवले जाते. यामुळे रोजगार बुडवून, कामधंदा सोडून पंचायत समितीत येणाऱ्या गरीब ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रवास खर्च आणि दिवसभराचा रोजगार बुडत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकारावर माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी जोरदार टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, देवरुख पंचायत समितीचा कारभार हा भोंगळ कारभार आहे. ग्रामपंचायत अधिकारी हे कामाच्या ठिकाणी हजर राहत नाहीत. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. संगमेश्वरसारख्या दुर्गम तालुक्यातील जनतेला शासनाच्या योजना वेळेत मिळणे गरजेचे असताना अधिकारीच गैरहजर राहत असतील तर शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत कसा पोहोचणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही शेकासन यांनी केला आहे. गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित असताना, कोणीही याची दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनावर लोकप्रतिनिधी सह कोणाचेही नियंत्रण उरले नसल्याचे चित्र दिसत असे ही त्यांनी सांगितले
पुढील आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही, ग्रामपंचायत अधिकारी नियमितपणे कार्यालयात हजर राहिले नाहीत आणि प्रलंबित दाखल्यांचा निपटारा झाला नाही, तर पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसअल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी दिला आहे.
त्यांच्या या भूमिकेला अनेक ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला असून आता प्रशासन या इशाऱ्याची दखल घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



