रत्नागिरीराजकीय

रत्नागिरीतील कॉन्क्रीट रस्त्यांचं वास्तव काय? अरुंद रस्ते बनले मृत्यूचा सापळा!

रत्नागिरी नगर परिषद गप्प का? - ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा गंभीर सवाल

रत्नागिरी दि. २७ ऑगस्ट :-  रत्नागिरी शहरातील 100 किमी रस्ते कॉन्क्रीट करण्याचा गाजावाजा करणाऱ्या नगर परिषदेचा कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. या कॉन्क्रीट रस्त्यांच्या निकृष्ट दर्जा आणि नियोजनशून्य कामामुळे सामान्य रत्नागिरीकरांचा जीव धोक्यात आला असून, यावर ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी नगर परिषदेला थेट जाब विचारला आहे.

फुटपाथ मोकळे करण्यासाठी गरीब विक्रेत्यांवर कारवाई करणारी नगर परिषद, कॉन्क्रीट रस्त्यांच्या घोळावर मात्र मूग गिळून गप्प का आहे? असा घणाघात सावंत यांनी केला.

प्रसाद सावंत यांनी उपस्थित केलेले 8 गंभीर सवाल –

1. 100 किमी रस्ते पूर्ण झाले का? टेंडर निघाल्यापासून किती महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित होते? मुदत संपूनही काम अपूर्ण असेल तर ठेकेदाराला नोटीस बजावली का?

2. रस्ते अरुंद का झाले? पूर्वीच्या डांबरी रस्त्यांपेक्षा कॉन्क्रीट रस्ते अरुंद झाले आहेत. दोन एसटी बसेस एकमेकांना पास होऊ शकत नाहीत. यात सामान्य नागरिक भरडला जातोय, याचे दुःख नगर परिषदेला दिसत नाही का?

3. मृत्यूचा सापळा – साईडपट्टीचे काय? कॉन्क्रीट रस्त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक टाकायचे होते, त्याला किती महिने झाले? साईडपट्टी अर्धवट असल्याने किती अपघात झाले? याला जबाबदार कोण? नगर परिषद की ठेकेदार?

4. दुहेरी खर्चाचा घोटाळा? बऱ्याच ठिकाणी साईडपट्टी डांबरीने भरली आहे. मग तिथे पेवर ब्लॉक बसणार की नाही? बसणार असेल तर हा डांबरीचा अतिरिक्त खर्च कोणी केला? जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी का?

5. मारुती मंदिर सर्कलचा कोबल स्टोनचा घाट कोणासाठी? : मारुती मंदिर सर्कलला कोबल स्टोन (दगडी) रस्ता का बनवला? याची सध्याची अवस्था नगर परिषदेने पाहिली का? कोबल स्टोनचा हा घाट कोणासाठी घातला?

6. ठेकेदाराला डबल फायदा? 

टेंडरमध्ये काय नमूद आहे? कॉन्क्रीट की कोबल स्टोन?

जर टेंडरमध्ये कॉन्क्रीट असेल आणि काम कोबल स्टोनचे झाले असेल, तर ठेकेदाराला डबल फायदा कोणी करून दिला?

7. न्यायालयात केस असताना काम कसे? कॉन्क्रीटीकरणावर न्यायालयात लढाई सुरू असताना कोबल स्टोनचे काम करता येते का? याचे उत्तर नगर परिषद देईल का?

8. जोडाचा (Joint) दर्जा काय? दोन कॉन्क्रीट स्लॅबमधील जोडाची एकदा पाहणी करा, म्हणजे तुम्हाला समजेल रत्नागिरीकर किती खड्ड्यातून प्रवास करत आहेत.

“नागरिकांसाठी फुटपाथ मोकळे करायला तुम्ही गरीब विक्रेत्यांना हटवले, चांगली गोष्ट आहे. मग हीच तत्परता दाखवून या कॉन्क्रीट रस्त्याच्या ठेकेदाराची चौकशी कधी लावणार? रत्नागिरीकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कामाची जबाबदारी निश्चित करा, अन्यथा युवासेना रस्त्यावर उतरेल,” असा इशारा प्रसाद सावंत यांनी दिला आहे.

या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी,नगराध्यक्ष काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button