भंडारपुळेच्या आदर्श जीवन शिक्षण शाळेचा ऐतिहासिक निकाल! तिन्ही इयत्तांचा शिष्यवृत्ती परीक्षेत १००% यश
ओम बाचीम तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात सातवा!

गणपतीपुळे दि. २० ऑगस्ट (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील आदर्श जीवन शिक्षण मराठी शाळेने इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा हुशार विद्यार्थी ओम विजय बाचीम याने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर रत्नागिरी तालुक्यात प्रथम क्रमांक आणि रत्नागिरी जिल्ह्यात सातवा क्रमांक पटकावून शासकीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्याचा बहुमान मिळवला आहे. ओमच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण भंडारपुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश : निकाल १०० टक्के!
येथील आदर्श जीवन शिक्षण शाळेने यावर्षी गुणवत्तेचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शाळेचा केवळ एका वर्गाचा नव्हे, तर यावर्षी झालेल्या तिन्ही शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल १००% लागला आहे.
यामध्ये: इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा – १००% निकाल इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा – १००% निकाल इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा – १००% निकाल एकाच वर्षी तिन्ही शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये १००% निकाल लावण्याची ऐतिहासिक कामगिरी या शाळेने केली आहे.
मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका समिधा नितीन सावंत यांचे खंबीर नेतृत्व व योग्य नियोजन तसेच वर्गशिक्षक तानाजी माने आणि प्रीती करके यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम व मोलाचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे. तसेच शिक्षकांनी घेतलेली विशेष तयारी आणि पालकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच हे यश संपादन करता आले, असे मुख्याध्यापिका समिधा सावंत यांनी सांगितले.
यशस्वी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ओम विजय बाचीम आणि १००% निकाल मिळवून शाळेचे नाव उंचावणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि पालकांकडून भरभरून अभिनंदन व कौतुक होत आहे.
तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे भंडारपुळे येथील शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व माता-पालक संघ आदर्श जीवन शिक्षण मराठी शाळा भंडारपुळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.



