रत्नागिरी

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

प्रा. पद्मा हुशिंग यांची अध्यक्षपदी एकमताने पुनर्नियुक्ती आणि कोकण विभागाच्या सुनेत्रा जोशी व ऋतुजा उमेश कुळकर्णी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

रत्नागिरी दि. १७ ऑगस्ट : आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची वार्षिक सभा तसेच संस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात बिनविरोध पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. पद्मा हुशिंग (ठाणे) यांची एकमताने पुनर्नियुक्ती करण्यात आली.

नुकतेच ठाणे येथील ज्येष्ठांचे नंदनवन सभागृह, लुईस वाडी येथे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. अॅडव्होकेट उमा धापटे यांच्या मार्गदर्शनाखाली, नयना सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वासंती वर्तक यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील संस्थेचे सर्व आजीवन सदस्य, विश्वस्त, सल्लागार, माजी कार्यकारिणी पदाधिकारी, विभाग प्रमुख तसेच जिल्हा शाखा प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती. सचिव वृषाली राजे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

नवी कार्यकारिणी जाहीर

नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रा. पद्मा हुशिंग, ठाणे, उपाध्यक्षपदी शुभांगी गान, नागपूर, सचिवपदी मानसी जोशी, कार्याध्यक्षपदी यामिनी पाठक, पुणे, खजिनदारपदी प्रतिभा चांदुरकर, ठाणे, सहखजिनदारपदी अस्मिता चौधरी, ठाणे, सहसचिवपदी प्रा. स्नेहल पाठक, मराठवाडा-बीड आणि सुनेत्रा जोशी, रत्नागिरी यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून माधुरी नवरे (डोंबिवली), वैशाली जोशी (डोंबिवली), देविका देशमुख (अकोला), मनीषा पाटील (सांगली), माधुरी चौधरी (संभाजीनगर), कविता कठाणे (विदर्भ), ऋतुजा उमेश कुळकर्णी (रत्नागिरी), संध्या प्रमोद महाजन (जळगाव) आणि ज्योती राजन टिपणीस (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली.

कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा

या निवडणुकीत आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी यांची मध्यवर्ती संस्थेच्या सहसचिवपदी नियुक्ती होणे ही रत्नागिरीसह संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

त्याचप्रमाणे ऋतुजा उमेश कुळकर्णी, रत्नागिरी यांची मध्यवर्ती संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य तसेच प्रसिद्धी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभागातील साहित्यिक व लेखिका चळवळीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने या दोन्ही नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

संस्थेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध होणे हे संस्थेतील एकजूट, परस्पर विश्वास आणि साहित्यिक कार्याला दिलेले महत्त्व याचे द्योतक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला लेखिकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या साहित्यिक कार्याला प्रोत्साहन देणे आणि विविध साहित्यिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button