रत्नागिरी

आंबा घाटात रस्त्याला मोठ्या भेगा; एसटीसह अवजड वाहनांची वाहतूक आजपासून पूर्णपणे बंद

रत्नागिरी, दि. १२ ऑगस्ट : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH 166) आंबा घाटात रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्या आहेत. १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी आज (१२ ऑगस्ट) पासून आंबा घाटातून जाणारी एसटी, प्रवासी बसेस आणि सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची (Heavy Vehicles) वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, हलक्या वाहनांना स्वतःची जबाबदारी घेऊन आणि नियंत्रित वेगाने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.

सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) रत्नागिरी ते कोल्हापूर या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आंबा घाट हा भाग अत्यंत तीव्र उताराचा आणि खोल दऱ्यांचा असल्याने अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यासाठी संवेदनशील आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील कि.मी. ६९.५०० ते कि.मी. ६९.६०० दरम्यान डाव्या बाजूला रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूंना सुमारे १०० मीटर खोल दरी आहे. त्यामुळे रस्ता खचून जीवित वा वित्तहानी होऊ नये, यासाठी तातडीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

रत्नागिरी ते कोल्हापूर व कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या एसटी बसेस आणि अवजड वाहनांसाठी प्रशासनाने खालील पर्यायी मार्ग सुचवले आहेत:

रत्नागिरी – हातखंबा – पाली – अणुस्कुरा घाट – राजापूर / कोल्हापूर

स्थानिक प्रशासनाने ठरवलेले इतर पर्यायी मार्ग (उदा. भुईबावडा घाट किंवा फोंडा घाट)

कडक पोलीस बंदोबस्त; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवरील चेक पोस्टवर आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. तसेच, NHAI ने बाधित ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक (Caution Boards), रिफ्लेक्टिव्ह बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी दिवे/रेड ब्लिंकर्स बसवावेत व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

प्रशासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करून घाटात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा वाहनावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० व ३४ नुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button