भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या निधनावर नितेश राणेंकडून शोक व्यक्त

रत्नागिरी दि. ६ ऑगस्ट : भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनाबद्दल राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्वीट) द्वारे शोक व्यक्त केला आहे.
आपल्या शोकसंदेशात नितेश राणे यांनी म्हटले आहे की, “भाजपाचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी समर्पित भावनेने कार्य केले. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि संघटन कौशल्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने एक निष्ठावान, कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय नेतृत्व हरपले आहे.”
यावेळी त्यांनी दिवंगत राजेश सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. सावंत कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजेश सावंत यांच्या निधनामुळे भाजप कार्यकर्त्यांसह रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, अनेक मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.



