ज्ञानातून सत्याचा धर्म, खऱ्याचा रस्ता दाखवा- डॉ. विवेक बेल्हेकर
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी प्रदान सोहळा

रत्नागिरी दि. २७ जुलै : पदवीदान समारंभ विद्यार्थ्याच्या आयुष्यातील मैलाचा दगड असतो. आपल्या यशाच्या मागे अनेक भागीदार असतात. आपल्या ज्ञानाचा समाजासाठी समर्थपणे आणि जबाबदारीने वापर करणे महत्वाचे आहे. एआय, वातावरण बदल, जागतिकीकरण यामुळे समाजाचा आयाम बदलत आहे, त्या बदलाचा आपण एक संदर्भ बनावे. ईशोपनिषदातील वचनात सांगितल्याप्रमाणे ज्ञानातून सत्याचा धर्म, खऱ्याचा रस्ता दाखविण्याचे काम व्हावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. विवेक बेल्हेकर यांनी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी प्रदान सोहळ्यात केले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंतांना यावेळी गौरवण्यात आले. अध्यक्षीय भाषणात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की, माणुसकी नाही तर माणूस कुठला असा प्रश्न उपस्थित करत शिक्षणातून माणुसकीची जोपासना व्हावी. मन ताब्यात राहणे अवघड आहे. उद्या कधीच उजाडत नाही म्हणून ठरवलेली गोष्ट आजच करा. जे आपल्याकडे नाही ते शिकण्याचा प्रयत्न करा. यश प्रामाणिक कष्टांनी मिळवा आणि त्या यशाने लोकांचे जगणे सुकर करा.
याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ.चंद्रशेखर केळकर,महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उप प्राचार्या डॉ. सीमा कदम, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे आदी उपस्थित होते.
शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत पदव्युत्तर पदवी परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल ८६ टक्के लागला. १६ पदव्युत्तर विभागातील १६ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयातील संशोधन केंद्रामधून पीएच.डी. प्राप्त केलेल्या डॉ. अश्विनी देवस्थळी यांना सुवर्णपदकासह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ९ गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयामधून पदवी घेऊन जाताना एक जबाबदार नागरिक म्हणून काम करण्याचे आणि आई-वडील कुटुंब आणि शिक्षक यांच्याप्रति कृतज्ञ राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ.चंद्रशेखर केळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपल्यातील सद्गुणांची जोपासना करण्याचे आवाहन केले.



