श्री स्वामी समर्थ मठ, गांवखडी रत्नागिरी येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

रत्नागिरी दि. २४ जुलै :- श्री स्वामी समर्थ मठ, गांवखडी रत्नागिरी येथे गुरुपौर्णिमा उत्सव बुधवार दिनांक २९ जुलै रोजी श्री स्वामीनामाच्या आणि गुरुदेव श्री दासदिगम्बर स्वामी यांच्या नामाच्या जयघोषात अत्यंत भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ, गांवखडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ७ वा. गुरुदेव श्री दासदिगम्बर स्वामींच्या हस्ते श्री स्वामी समर्थदेवांचे पूजन व श्री स्वामीदेवांच्या चरणांवर अभिषेक, सकाळी ९ वा.श्री स्वामी समर्थ आणि ओम दिगम्बराय नमः मंत्र पठण, सकाळी ११ वा. असंख्य स्वामीभक्तांसोबत गुरुदेव श्री दासदिगम्बर स्वामी यांचे स्वागत. त्यानंतर भक्तगणांकडून श्री गुरुदेवचरणांचे पाद्यपूजन असा कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर सकाळी ११.३० वा.’गुरुमहती’ आणि ‘नमन श्री गुरुचरण’ पोथीचे पठण, दुपारी १२ वा. भक्तगणांचे गुरुदेवांप्रति प्रतिपादन, दुपारी १२.४५ वा. गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामींचे आशीर्वचन, दुपारी १.३० वा.श्री स्वामीदेवांना आणि गुरुदेवांना महानैवेद्य अर्पण व महाआरती. त्यानंतर महाप्रसादाचे भक्तगणांना वाटप. महाप्रसादानंतर गुरुदेव श्री दासदिगम्बर स्वामींचा प्रत्यक्ष चरणदर्शन सोहळा संपन्न होईल.
सायंकाळी ६.३० वा. भक्तगणांसाठी विशेष ‘तिमिरातून तेजाकडे नेणारा दीपोत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. प्रपंचामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन अंधाररुपी दुःख दारिद्य यांचा नाश होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, समृध्दी, शांती नांदून आपले जीवन पूर्णतः प्रकाशमय होण्यासाठी प्रत्येक भक्ताने किमान एक किंवा अधिकतम दिवे दीपोत्सवासाठी मठामध्ये आपले नाव देऊन प्रज्वलीत करावेत. एका दिव्यासाठी सेवामूल्य रु. १० आहे.
रात्री ८ वा. नित्याच्या आरत्या आणि रात्री ९ वा.भजन, असे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भक्तगणांनी मठामध्ये उपस्थित राहून श्री स्वामीदेवांची व श्री गुरुदेवांची कृपा आणि सामर्थ्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

