रत्नागिरी

रत्नागिरीकरांसाठी मोफत वैकुंठ रथ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

रत्नागिरी दि. १९ :- रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण मारुती मंदिर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडले. या प्रसंगी रवींद्र चव्हाण यांनी दाखविलेला कार्यकर्त्यांप्रती सन्मान आणि संघटनाविषयीचा जिव्हाळा उपस्थितांच्या विशेष लक्षात राहिला.

लोकार्पणावेळी रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांना आवर्जून पुढे बोलावून घेतले आणि त्यांच्या समवेत फीत कापून वैकुंठ रथाचे उद्घाटन केले. कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणारी ही कृती पक्ष संघटनेबद्दल असलेल्या त्यांच्या आत्मीयतेची साक्ष देणारी ठरली.

यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी हा वैकुंठ रथ रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित असल्याचे सांगितले. या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नागरिकांना पूर्णपणे मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबांवरील आर्थिक भार कमी व्हावा आणि गरजू नागरिकांना सन्मानपूर्वक सेवा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वैकुंठ रथासाठी संदीप रसाळ आणि नगरसेविका सुप्रिया रसाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांनी रवींद्र चव्हाण तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्याशी समन्वय साधून हा उपक्रम लवकरात लवकर रत्नागिरीकरांच्या सेवेत उपलब्ध व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरीकरांना मोफत वैकुंठ रथाची सुविधा उपलब्ध करून देत भारतीय जनता पार्टीने सामाजिक संवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button