रत्नागिरी
रत्नागिरी शहरात धुळीचे वादळ; नागरिकांची तारांबळ

रत्नागिरी दि. ९ :- रत्नागिरी शहरात आज सायंकाळच्या सुमारास अचानक धुळीचे वादळ निर्माण झाल्याने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यासह उडालेल्या धुळीमुळे शहरातील अनेक भागांत दृश्यमानता कमी झाली असून वाहनचालकांना वाहन चालविताना अडचणींचा सामना करावा लागला.
अचानक बदललेल्या हवामानामुळे रस्त्यावरील फेरीवाले, दुचाकीस्वार तसेच पादचारी यांची मोठी गैरसोय झाली. अनेक ठिकाणी धूळ घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हवामान विभागाने कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट वातावरणामुळे वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि सावध राहावे, असे आवाहन केले आहे.


