रत्नागिरी

चिपळूणमध्ये ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जनजागृती रॅली

रत्नागिरी, दि. १७ : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा प्रसार करण्यासाठी चिपळूण तालुका आरोग्य विभागातर्फे आज शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि नर्सिंग विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथून श्रीफळ वाढवून रॅलीला सुरुवात झाली. चिपळूण नगर परिषद परिसरात तिची समाप्ती झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या नेतृत्वाखाली ही रॕली काढण्यात आली.

प्रमुख उपक्रम आणि मार्गदर्शन

रॅलीदरम्यान आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट केली:

डॉ. ज्योती यादव: नागरिकांनी आरोग्याप्रती जागरूक राहून प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याचे आवाहन केले.

डॉ. कांचन मदर (कामथे उपजिल्हा रुग्णालय): नागरिकांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घेण्याचे महत्त्व पटवून दिले.

विशेष आकर्षण: कॅन्सर तपासणीसाठीची विशेष व्हॅन या रॅलीमध्ये सहभागी होती. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या रॅलीत डॉ. अजय सानप, संजीवनी नर्सिंग कॉलेजचे जगदीश व हर्षा वाघुळदे, आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार यांच्यासह अनेक आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आरोग्याविषयीचे फलक आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

या रॅलीच्या माध्यमातून चिपळूण शहरात आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आरोग्य विभागाला मोठे यश आले असून, शासनाच्या आरोग्य सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button