आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेट

रत्नागिरी दि. २४ :- केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी दि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” विशेष अभियान राबविले जात आहे. या शिबिरामार्फत महिलांसाठी आरोग्य तपासणी, उपचार, समुपदेशन सेवा मोफत पुरविल्या जात आहेत.
दि. २४ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खानू ता. रत्नागिरी येथे आयोजित “स्वस्थ नारी, सशक्त परिवार”अभियान शिबिराला महाराष्ट्र राज्य,सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य सेवा कोल्हापूर परिमंडळ उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी भेट दिली.

भेटीदरम्यान त्यांनी शिबिरामार्फत जनतेस देण्यात येत असलेल्या आरोग्य सेवांची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. विवेकानंद बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्व नागरिकांनी आपल्या घरातील सर्व महिला व मातांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे व आरोग्य विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सर्व सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य,सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले.



