सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ — सागरी पोलीस स्टेशन नाटे व राजापूर पोलिसांचे आवाहन

जैतापूर दि. ३० (राजन लाड) :- भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उद्या, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सागरी पोलीस ठाणे नाटे आणि राजापूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकता दौड’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौडीला सकाळी पावणे सात वाजता सागरी पोलीस ठाणे नाटे आणि राजापूर पोलीस स्टेशन येथून प्रारंभ होणार असून, सकाळी साडेसहापासून ते आठ वाजेपर्यंत हा उपक्रम पार पडेल.
सर्व पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व राजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.
हा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून, या ‘एकता दौडी’च्या माध्यमातून राष्ट्रीय ऐक्य, बंधुभाव आणि देशभक्तीचा संदेश समाजात पोहोचविण्यात येणार आहे.



