रत्नागिरी

आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात विधिज्ञ श्री. नरेंद्र राजपुरोहित यांचे ‘मूल्य शिक्षण आणि शिक्षणाचे महत्व’ विषयावर व्याख्यान संपन्न

देवरुख दि. १ ( प्रतिनिधी ) :- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजशास्त्र विभागाच्यावतीने “मूल्य शिक्षण आणि शिक्षणाचे महत्व” या विषयावर मा. विधिज्ञ श्री. नरेंद्र राजपुरोहित यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानाच्या सुरुवातीला संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी पुष्पगुच्छ देऊन राजपुरोहित यांचे स्वागत केले आणि आजच्या युगात याप्रकारच्या व्याख्यानाची असणारी गरज स्पष्ट केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सुरुवातीला व्याख्यानाला सदिच्छा देताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मूल्य शिक्षण यावर प्रकाशझोत टाकला.

राजपुरोहित यांनी आपल्या प्रभावी आणि समर्पक व्याख्यानात आधुनिक पिढीसमोरील नैतिक आव्हाने, सामाजिक माध्यमांचा वाढता प्रभाव, जबाबदारीची जाणीव, कायदेविषयक मूलभूत ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक मूल्ये यावर सखोल चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना सुजाण, संवेदनशील आणि राष्ट्राभिमानी नागरिक बनण्यासाठी मूल्य शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. व्याख्यानादरम्यान परस्पर संवादात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अनेक पैलू अधिक स्पष्ट करून घेतले. राजपुरोहित यांनी आपल्या व्याख्यानातून दैनंदिन जीवनातील आवश्यक असणाऱ्या मुल्यांची मांडणी केली.

व्याख्यानाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी केला. त्यांनी अध्यक्षीय समारोपात मूल्य शिक्षणाबाबत महाविद्यालय करत असलेले प्रयत्न यावर प्रकाश टाकला. हे व्याख्यान विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले. समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. विकास शृंगारे यांनी आभारप्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. सुनील सोनावणे आणि प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्या विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button