रत्नागिरी

रत्नागिरीत २२ व २३ फेब्रुवारी रोजी पहिले पक्षी संमेलन

रत्नागिरी दि. १८ :- रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीमध्ये जिल्हा पक्षीमित्र संमेलनाचे जंगी आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील समृद्ध पक्षी वैभवाला आणि येथील विविध पक्षी अधिवासाला एक नवी ओळख मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

या दोन दिवसीय संमेलनाची सुरुवात २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हॉटेल कोहिनूर येथे प्रतिनिधी नोंदणीने होईल, त्यानंतर सकाळी ११ वाजता संमेलनाचे रीतसर उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन सत्रांनंतर पक्षी अभ्यासक आणि संशोधकांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

यामध्ये पक्षीमित्र प्रतिक मोरे हे ‘जंगलाचे शेतकरी’ या विषयावर आपले विचार मांडतील, तर विराज आठल्ये हे सागरी आणि स्थलांतरित पक्षी या विषयावर सखोल व्याख्यान देणार आहेत. तसेच निकिता शिंदे या रत्नागिरीतील पक्ष्यांच्या विविधतेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्रीय भेटींचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पक्षी अभ्यासक काजरघाटी, देवराई, सडामिऱ्या, नाचणे आणि कांदळवन क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पक्षी जीवनाचा अभ्यास करतील.

या विशेष उपक्रमासाठी विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी विशेष मेहनत घेतली असल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button