
रत्नागिरी दि. २१ : कृ. चिं. आगाशे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता, स्पर्धात्मक वृत्ती व संघभावना विकसित व्हावी, या उद्देशाने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात मारचेंडू, लंगडी यांसारखे सांघिक खेळ, ५० मीटर, ८० मीटर धावणे आणि रिले धावणे अशा वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कौशल्ये सादर केली.
इयत्ता पहिली व दुसरीच्या स्पर्धांच्या उद्घाटनाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिनाथ कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर केळकर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर, उपकार्यवाह श्रीकृष्ण दळी, विश्वस्त चंद्रकांत घवाळी, विनायक हातखंबकर, राजेंद्र कदम, श्री. मोहिते, प्रवीण आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. गेली चाळीस वर्षे संतोष कुष्टे हे प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विविध कार्यक्रमांसाठी क्रीडांगणावर मोफत पाणीपुरवठा करत असल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
इयत्ता तिसरी व चौथीच्या स्पर्धांच्या उद्घाटनाला पटवर्धन हायस्कूलचे माजी शिक्षक गणेश गुळवणी, माजी मुख्याध्यापक हरी करमरकर, सौ. संजीवनी करमरकर प्रमुख उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धांतील विजेत्यांना देण्यात आलेली बक्षिसे, चषक व पदकांचे प्रायोजक आनंद किनरे व विक्रम लाड होते. मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली सुधीर शिंदे, सोमनाथ दुकले, माधव राठोड, प्रवीण आंबेकर, सर्व शिक्षकवृंदांच्या सहकार्यामुळे हा क्रीडामहोत्सव यशस्वीरीत्या झाला.



