थेट नगराध्यक्षपदासाठी ६ तर १६ प्रभागातील ३२ नगरसेवकपदांसाठी ११३ उमेदवार रिंगणात
रत्नागिरी नगर परिषद निवडणूक; १९ उमेदवारांनी घेतली माघार

रत्नागिरी दि. २२ :- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल पंधरा जणांनी अर्ज मागे घेतले. बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या भाजपाच्या चार जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. एकूण १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, थेट नगराध्यक्षपदासाठी सहा तर १६ प्रभागातील ३२ नगरसेवकपदांसाठी ११३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी थेट तर काही ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी प्रभाग 5 बमधून मंजुळा कदम, प्र. 4 ब मधून रोहन वरेकर, वक्रतुंड शेट्ये, प्र. 9 अ. मधून शुभम सोळंकी तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्र. 3 ब मधून हीना बावानी, प्र. 1 अ मधून श्रेया शिंदे व प्रणाली रायकर, प्र. 4 ब मधून रफिक मुकादम, प्र. 9 ब मधून कल्पना मसुरकर व कामना बेग, प्र. 14 ब मधून श्रीनिवास तळेकर, प्र. 12 ब मधून करण नागवेकर, प्र. 10 ब मधून विभव पटवर्धन, प्र. 5 अ मधून अभिलाष पिलणकर, प्र. 8 ब मधून सोमनाथ पिलणकर, प्र. 7 व 6 ब मधून प्राजक्ता रुमडे, प्र. 7 अ मधून नितीन माईण या अपक्ष उमेदवारांनी तर प्र. 12 अ मधून शिवसेना उबाठाच्या श्वेता योगेश कोरगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामध्ये भाजपाच्या चार बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.



