मच्छीमार आणि प्रवासी बोट व्यवसायातील विविध समस्यांवर मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित

मुंबई, दि. ५ : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयातील दालनात राज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवासी बोटी चालकांच्या विविध समस्यांवर बैठक पार पडली.
या बैठकीत प्रमुख्याने गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा लेणी व पुढे अलिबाग येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत तसेच वर्षानुवर्षे वापरत असलेल्या जुनाट झालेल्या बोटींच्या बदलाबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाला मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिले. तसेच जुन्या बोटी या लाकडाच्या असून त्या जीर्ण व कालबाह्य झाल्याने त्याऐवजी प्रवासी सुरक्षा व सोयी-सुविधायुक्त अत्याधुनिक बोट प्रायोगिक तत्वावर बनविण्यात याव्यात, असे मंत्री योगेश कदम यांनी सुचवले असता त्यास बंदरे मंत्री यांनी हिरवा कंदील दर्शविला असून पहिल्या टप्प्यात दहा बोटी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले.
सदर बैठकीस मत्स्यव्यवसाय व पशू संवर्धन सचिव रामा स्वामी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मुख्य सर्व्हेअर व इतर उपस्थित होते.



