रत्नागिरी शहरातील रस्ते डांबरीकरणाचे काम वेगाने सुरू

रत्नागिरी दि. १६ :- परतीचा पाऊस लांबल्याने रत्नागिरी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामात अडचण येत होती. पाऊस थांबल्यानंतर तात्काळ कामे हाती घेऊन येत्या दोन महिन्यात रत्नागिरी खड्डेमुक्त करण्यात येईल असे आश्वासन रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली होती. त्यानुसार रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाने आता वेग घेतला असून, रत्नागिरी शहरातील प्रमुख अशा राम आळीतील रस्ते डांबरीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे.
सातत्याने होणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यात परतीचा पाऊस लांबल्याने रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे कामही लांबणीवर पडले होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी शहरातील रस्ते दुरुस्त करून दोन महिन्यात रत्नागिरी शहर खड्डेमुक्त केले जातील, असे आश्वासन रत्नागिरीचे पालकमंत्री ना. सामंत यांनी दिले होते.
ना. सामंत यांच्या आश्वासनाची आता पूर्तता होताना दिसत असून, रत्नागिरी शहरातील रस्ते डांबरीकरणाचे सुरू झाले आहे. त्यातच शहरातील राम आळी येथील रस्त्यावरही खड्डे पडले होते. रस्त्याच्या दुर्दशेकडे रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांनी देखील पालकमंत्री ना. सामंत यांच्या कडेही रस्त्याच्या कामाची मागणी केली होती. त्यानुसार आता राम आळीतील रस्ते डांबरीकरणाचे काम सुरु झाले आहे.



