
रत्नागिरी दि. १२ :- शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला. या बैठकीत महायुतीचा एकसंघ संकल्प दृढ करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
सर्वप्रथम या बैठकीच्या आयोजनाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये महायुतीची साखळी अधिक मजबूत व्हावी, यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच मा. खासदार नारायण राणे साहेब यांनीही महायुतीने एकत्र येऊन लढले पाहिजे, या भूमिकेमुळे आज आपल्या एकतेला अधिक बळ मिळाले आहे.

महायुती ही केवळ राजकीय आघाडी नाही, तर विकासाचा आणि जनतेच्या विश्वासाचा एकसंघ परिवार आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आली आहे, असे यावेळी ना. उदय सामंत यांनी म्हटले.
यावेळी ना. उदय सामंत यांनी सांगितले की, महायुतीत पूर्ण समन्वय राखून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यात येतील. कार्यकर्त्यांमध्ये एकोपा राखून, परस्पर संवाद व समजुतीच्या आधारे सर्व निर्णय घेतले जातील. ज्याला उमेदवारी मिळेल तो आपल्याच परिवाराचा भाग समजून, सर्वांनी मिळून विजय मिळवायचा आहे.
महाविकास आघाडीने आपल्या नेत्यांवर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या विश्वासाने उत्तर द्यायचे आहे. आगामी निवडणुका या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या एकतेची परीक्षा आहेत — आणि या परीक्षेत आपण सर्वजण यशस्वी होऊ, याचा मला ठाम विश्वास आहे.
महिला, युवा आणि सर्व पदाधिकारी यांच्या सहभागाने महायुतीची ताकद प्रत्येक मतदारसंघात दिसून येईल. आगामी निवडणुकीच्या रणांगणात तीन तारखेला जे फटाके वाजतील — ते महायुतीच्या विजयाचे फटाके असतील, असे ना. उदय सामंत म्हणाले.
या प्रसंगी आमदार किरण भैया सामंत, रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष, भाजपाचे नेते अशोकजी मयेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार राजन साळवी, बापूसाहेब चव्हाण, पाटणे साहेब, अमित केतकर, राजेंद्र महाडिक, महेशशेठ मयेकर, दादा ढेकणे, विवेक साळवी, सुदेश मयेकर, राजन शेटे, यांसह मोठ्या संख्येनं महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.


