संगमेश्वर राजवाडी येथे शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार संशयितांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात
१२ बोअर बंदूक, काडतुसे, हँड टॉर्च आदी मुद्देमाल केला जप्त

रत्नागिरी दि. ७ :- संगमेश्वर येथील राजवाडी पैकी ब्राह्मणवाडी साईमंदिर समोर शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार संशयितांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातील १२ बोअर बंदूक, काडतुसे आदि मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वा. वनविभागाचे अधिकारी गस्त करत असताना मौजे- राजवाडी पैकी ब्राह्मणवाडी साईमंदिर समोर, ता. संगमेश्वर येथे मौ. अणदेरी ते राजवाडी मार्गाने बोलेरो पिकअप क्र. MH-०८ AP- ८६२१ या वाहनाच्या टपावर बसुन हॅंड टॉर्चचा लाईट शिकारीच्या उद्देशाने फिरणारे वाहन थांबवून गाडीची झडती घेण्यात आली. त्यावेळी या वाहनामध्ये एकूण चार संशयित इसम, १२ बोअर बंदुक ०१, जिवंत काडतुसे ०६, हॅंड टॉर्च ०२ इ. मुद्देमाल मिळून आल्याने तो गाडीसह जप्त करुन पुढील चौकशी कामी ताब्यात घेतला आहे.
या कार्यवाहीमध्ये चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विश्वनाथ शांताराम मालप वय २९ वर्षे, रा. अणदेरी, ता. संगमेश्वर, गजानन मानसिंग इंदुलकर वय ४३ वर्षे, रा. हेदली, ता संगमेश्वर, रुपेश धोंडु पोमेंडकर वय ४१ वर्षे, रा. कारभाटले, ता. संगमेश्वर, आणि राहुल रविंद्र गुरव वय २८ वर्षे, रा. तिवरे घेरा प्रचितगड, ता. संगमेश्वर अशी चार संशयितांची नावे असून, सदर घटनेचा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी आवश्यक कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर जी. गुरुप्रसाद सर (भा.व.से) व विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कार्यवाहीसाठी श्री प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री सागर गोसावी वनपाल संगमेश्वर (देवरुख), वनरक्षक श्री. सुरज तेली आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे, यांनी ही कार्यवाही केली असुन पोलीस पाटील अणदेरी महेंद्र होडे, पोलीस पाटील राजवाडी विलास राऊत, सुलतान मालगुंडकर, अनंत तोरस्कर यांचे सहकार्य लाभले. अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडत असल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई यांनी केले आहे.


