भाजपाचे रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष श्री. राजेश सावंत यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
ऐन निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेने रत्नागिरीच्या राजकारणात खळबळ

रत्नागिरी दि. ५ :- भाजपाचे रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष श्री. राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपाचे वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर केला आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत सावंत यांनी राजीनामा दिल्याने रत्नागिरीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
काल निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच भाजपचे रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांचेकडे सदर केल्याचे समजते. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी राजीनामा दिल्याने रत्नागिरीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
उबाठाचे नेते बाळ माने यांची सून ही भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळ माने यांनी आपल्या सुनेला नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीच्या बैठकीत यावर वारंवार चर्चा होणार असल्याने आपल्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा भाजपाचे वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर केला आहे.
सावंत यांचा राजीनामा भाजपाचे वरिष्ठ पातळीवरून अद्याप मान्य करण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजपकडून आता कोणता निर्णय घेतला जातो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.



