
रत्नागिरी दि. १६ :- लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढलो. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवल्या जातील आणि या निवडणुकीत महायुतीचा भगवा डौलाने फडकेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असत की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. या त्यांच्या भावना आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढलो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील महायुती म्हणून लढवल्या जातील. या निवडणुकीत महायुतीला मोठ यश मिळेल असे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना आता पराभव समोर दिसू लागल्याने ते आता निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. याआधी निवडणुका लवकर घ्या असे म्हणत होते. आता निवडणुका पुढे ढकला असे बोलत आहेत. विजयची खात्री नसल्याने विरोधक एकत्र येत निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे आणि रडीचा डाव सुरू झाला आहे. मात्र या निवडणुकीत महायुतीचा भगवा डौलाने फडकेल असे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.



