धाऊलवली-पारवाडीच्या पाणी योजनेला गती; आमदार किरण सामंत यांच्या निधीतून पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन

जैतापूर दि. १४ सप्टेंबर :- गेली अनेक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाऊलवली-पारवाडी ग्रामस्थांचा पाणीप्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. लोकप्रिय आमदार किरण (भैय्या शेठ) सामंत यांच्या फंडातून जलस्वराज्य योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी निधी उपलब्ध झाल्याने या कामाला सुरुवात झाली आहे. पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन राजापूर तालुका सभापती सौ. नंदिनी कदम आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. कोमल नवाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
धाऊलवली-पारवाडी परिसरातील ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. आमदार किरण शेठ सामंत आणि शिवसेना राजापूर तालुका अध्यक्ष श्री. नागले यांच्या प्रयत्नातून यापूर्वी पाण्यासाठी विहीर मंजूर करण्यात आली होती. विहिरीचे काम पूर्ण झाले होते; मात्र पाण्याची टाकी नसल्याने योजना रखडली होती.
ही बाब लक्षात घेऊन आमदार भैय्या सामंत यांनी पाण्याच्या टाकीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने आता या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. तसेच तालुका सभापती नंदिनी कदम, मा. नागले साहेब आणि जिल्हा परिषद सदस्या कोमल नवाळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून कामाला गती दिली आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला पारवाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल पडल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी ग्रामस्थांनी आमदार किरण शेठ सामंत यांचे यांचे आभार मानले.
पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच धाऊलवली-पारवाडी परिसरातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.



