रत्नागिरी

आंबा घाटात कर्तव्यावरील एसटी व पोलीस कर्मचाऱ्यांना आमदार किरण सामंत यांचा दिलासा

पावसात भिजणाऱ्या एसटी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तातडीने निवारा शेडची केली व्यवस्था

देवरूख दि. २५ ऑगस्ट :- एसटी वाहतुकीसाठी आंबा घाट सुरू असल्याने घाटमार्गातून ये-जा करणाऱ्या एसटी बस चालकांना आवश्यक मार्गदर्शन करणे, तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी एसटी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी पावसातही अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. मात्र, मुसळधार पावसात या कर्मचाऱ्यांना उभे राहण्यासाठी व पावसापासून संरक्षणासाठी निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नव्हती.

कर्तव्यावर असलेल्या या कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात येताच आमदार किरण सामंत यांनी तात्काळ दखल घेत निवारा शेडची व्यवस्था करून दिली. त्यामुळे पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या एसटी व पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा घाटातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी आपापली जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या मूलभूत गरजेकडेही लक्ष देणारे आमदार किरण सामंत यांचे हे कार्य त्यांच्या संवेदनशील आणि तत्पर नेतृत्वाची प्रचिती देणारे ठरले आहे.

मोठ्या प्रश्नांबरोबरच प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या छोट्या-छोट्या अडचणींचीही तातडीने दखल घेणे, ही त्यांच्या कार्यशैलीची विशेष ओळख असल्याची चर्चा आहे. जनतेच्या प्रश्नांसोबतच कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची व सुविधांची काळजी घेणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किरण सामंत यांनी पुन्हा एकदा आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे. त्यांच्या या तातडीच्या पुढाकारामुळे आंबा घाटात कर्तव्य बजावणाऱ्या एसटी व पोलीस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button