नाणीजच्या तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी चिराग खटकूळ यांची निवड

नाणीज दि. २३ ऑगस्ट :- रत्नागिरी तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत नाणीज अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते चिराग शरद खटकूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीची १५ ऑगस्ट रोजी तहकूब झालेली सभा २३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. या सभेत उपस्थितांनी सर्वानुमते चिराग खटकूळ यांची तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी निवड केली.
चिराग खटकूळ यांनी नाणीज परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात ते सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या रत्नागिरी दक्षिण मंडळ तालुकाध्यक्षपदी कार्यरत असून, नाणीज माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत.
नाणीज ग्रामपंचायतीचे प्रशासक विनायक शिवगण, उपप्रशासक नयना रेवाळे, ग्रामपंचायत सदस्य विजय गावडे, दत्ताराम शिवगण, पूजा पंडित, सरफरे, संध्या गुरव, ग्रामसेविका मुद्राळे, कर्मचारी नरेंद्र शिंदे, पोलीस पाटील नितीन कांबळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम खावडकर तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
चिराग खटकूळ यांच्या निवडीबद्दल उपस्थित ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



